Thursday, June 7, 2007

भेटी लागे जीवा

औगस्ट २००३ चा काळ. दादा नुकताच दुबई ला नोकरीनिमित्त गेलेला. मनात बाबांची चिंता कायम होती.बाबा गेली ३ वर्ष सतत आजारी असायचे. आणि आजार साधेसुधे नसायचे.त्यांना कित्येको वर्ष मधुमेह होता त्याचाच परिणाम होता तो. डावा पाय गुडघ्यापासुन काढलेला. Diabetic Gangrene झाला होता. त्या शस्त्रक्रियेनंतर नवीन Artificial limb लावेपर्यंत वर्ष लागलं. त्यात शरीरातील ताकद कमी झालेली त्यामुळे तो नवीन पाय लावून चालणं पण अवघड जायचं. Post operation healing was really a difficult part. ऒपरेशन नेहमी नीट व्हायचं त्यांचं. पण पुढचे हाल बघवत नसत. तरी अचाट सहनशक्ती असलेला माणुस. पाय कापल्यावर अशक्य वेदना होत होत्या पण तोंडातुन एक ब्र नाही निघाला. शांत पणे पडुन रहायचे. पायातुन कळ आलेली फ़क्त चेहरा सांगायचा. आईने अखंड सेवा केली मात्र. करत करत ते नवीन पाय लावून बर्यापॆकी चालू लागले.
त्यातुन सावरतात तोपर्यंत दुसरा पायात अशक्य वेदना होऊ लागल्या. सगळ्या तपासण्या झाल्य़ा. त्यातून असं निष्पन्न झालं की त्याही पायात मधुमेहा मुळे रक्त्वाहिन्यात अडथळे निर्माण झालेत. झालं पुन्हा एकदा operation just like angioplasty. फ़क्त पायाची एवढाच काय तो फ़रक. झालं नेहमीची सगळी post operative complications झाली. इतके थकायचे ना ते हे सगळं सहन करुन. एका पायाची शीर काढुन दुसर्या पायात घातली होती. दोन्ही मांड्याना ३०-३० टाके. टाके म्हणजे स्टेपलर च्या पिना होत्या. त्यात औषधांनी तोंडाची चव गेलेली. सगळे सांगताहेत नीट खा नाहीतर ताकद नाही येणार. बिचारे सगळं शांतपणे सहन करायचे. असं होत होत त्यातुनही बरे झाले.
त्याच वेळेस मी अभियांत्रिकी ची पदवी परीक्षा पास झाले होते. नोकरी साठी भटकंती चालू होती. दादाने सुध्दा दोनेक महिन्यात नोकरी बदलली. त्याला नवीन नोकरीला रुजु होऊन कसातरी आठवडा झाला असेल आणि अचानक एक दिवशी बाबांना जोरात थंडी वाजु लागली. रायगर म्हणतात तशी. त्याना जागचं हलता येईना आणि ग्लानी आली. मी आमच्या बिल्डींग मधील वॆद्यांना बोलावलं तर ते म्हणाले की लगेच इस्पितळात नेऊ. त्यांनी स्वत: त्यांना खांद्यावरून उचलून खाली गाडीपर्यंत नेलं आणि स्वत:च्याच गाडीतून घेऊन गेले. ह्यावेळेस किड्नी बाई रुसल्या होत्या . बर्याच तपासण्यांनंतर निदान झालं की त्यांच्या किड्नी मध्ये विषारी वायु तयार झाला आहे आणि तो कधीही बाहेर पसरु शकतो. त्यामुळे किड्नी अलगद बाहेर काढणं आवश्यक आहे. भयंकर नळ्या आणि त्यांच्या जाळ्यात ग्लानीत असलेले बाबा. त्या काळातल्या असंख्य रात्री आम्ही धसक्यात घालवल्यात. त्यांनी तर त्या कशा घालवल्या असतील देवच जाणो. एके दिवशी त्यांची ही किडनी सहीसलामत बाहेर निघाली आणि जीवावर बेतलेलं हे संकट तात्पुरतं का होईना टळलं.
त्यातुन ते बरे झाले. हिंडु फिरु लागले. कोकणात आले आमच्याबरोबर. दादासाठी मुलगी पाहायला. लग्न ठरलं, सर्व नातेवाईंकाच्या सहकार्याने छान पार पडलं.

नागीण, पाठीवर एक कार्बंकल असे काही आजार चालूच होते.
एकच किड्नी आहे आता तिच्यावर सगळा भार येणार आणि त्यामुळे तिच्यातही बिघाड होणार हे स्पष्टच होतं. फ़क्त मधे किती काळ जातो हेच काय ते होतं.

दादाला दुबईतली नोकरी सांगुन आली होती. त्याचं करियर आपल्यामुळे रोखलं जातंय म्हणुन बाबा त्याच्या जाम मागे होते की तु जा. ते म्हणायचे "मला बघायचं आहे तुला यश मिळवताना.संधी सारखी मिळत नसते, मी काय आज आहे उद्या नाही, माझी काळजी करत नको बसु". त्यांच्या आग्रहा खातर दादाने ती नोकरी स्वीकारली आणि तो १२ औगस्ट २००३ ला रवाना झाला.
मी , आई, बाबा , मंजु(माझी वहिनी, दादा एकटाच गेला होता, काही महिन्य़ांनी ती जायची होती), मंजूचा भाऊ मिलींद असे पाच जण घरी असायचो. घरातलं वातावरण छान ठेवणे ही बाबांची खुबी होती. इतकी आजारपणं झेलली पण कधी वातावरण सुतकी नव्ह्तं, कारण बाबा.ते खुप मस्त गाणी म्हणायचे. तसं अख्खं घरच संगीतमय असायचं. आई शास्त्रीय संगीताचे क्लास घ्यायची.मजा असायची घरात.

एक महिना तसा नीट गेला. किड्नी हळुह्ळु रंग दाखवत होती. माझे बाबा स्वत: डौक्टर होते त्यामुळे त्यांना पुढे काय याची कल्पना आलेली असायची पण सांगायचे नाहीत. एक दिवशी आईच्या लक्षात आलं की त्याना लघवी होत नाहीये म्हणुन. तेव्हा म्हणाले हो , नाही होत आहे २ दिवस. तुम्ही लगेच इस्पितळात न्याल म्हणुन सांगितलं नाही.त्याच दिवशी त्याना जुलाब चालू झाले. आम्ही दादाला फ़ोन लावला तर त्याला म्हणे "मी मजेत आहे तु नको काळजी करु. हे सगळे उगाच घाबरतात".
दादा काय समजायचं ते समजला.
आम्ही बाबांना पुन्हा एकदा इस्पितळात नेलं.डौक्टरनी सांगितलं की त्याच्या किडनीने काम करण बंद केलं आहे नी त्यामुळे लघवी न होता मलमूत्र सगळं एकत्रच मलावाटे बाहेर पडतंय. त्यामुळे दर तासाला त्याना पाण्यासारखे जुलाब व्हायचे.
त्याना जगायला डायलिसीस हा एकमेव उपाय होता.बाबा तयार नव्ह्ते. ते म्हणत होते" मला घरी न्या. आता जास्त दिवस नाहीत माझे. ते मला घरी घालवायचे आहेत.इथे नको वाटतं अगदी.".
तिकडे दादा बाबांना एकदा तरी भेटायचंच म्हणून यायच्या खटपटीत होता.रजा लगेच मंजूर झाली. पण त्याच्या पासपोर्टवर अजुन व्हिसा स्टॆंपिंग व्हायचा होता. नुअकताच गेलेला असल्याने काही सोपस्कार व्हायचे होते त्यापॆकी हा एक. हे काम लवकर व्हावं म्हणून त्याचा मॆनेजर पण बरीच खटपट करत होता. पण नेमकी ३ दिवस जोडुन सुट्टी आली दुबईत. सर्व सरकारी कचेरया बंद. हातावर हात धरून बसण्यापलिकडे कोणीच काही करू शकत नव्हतं.बाबांना भेटायला मिळेल ना? अनिवार इच्छा होती दोघांनाही एक्मेकाला भेट्ण्याची.तळमळत दिवस रात्र कंठत होता,पण येऊ शकत नव्हता.त्याच्या परिस्थितीची कल्पना तेव्हाही करवत नव्हती आणि अजूनही आठवलं तरी खुप त्रास होतो.

बाबांना, आता तुम्हाला दादाला भेटायचं ना, तो येतोय..असं सांगुन डायलिसीस साठी तयार केलं.डायलिसीस साठी एक वेगळं दालन होतं. तिथे आम्हाला पेशंट बरोबर थांबायची परवानगी नव्हती.मी मधेच भेटुन येत असे. मी अशीच एकदा आत त्यांना भेटायला गेले होते. त्यांचा हात हातात घेऊन उभी होते. बाबांच्या डोळ्यातुन पाणी ओघळत होतं." आत्ताच तर गेला मंदार, त्याला लगेच माझ्यामुळे यावं लागतंय, मला खुप अपराधी वाटतंय, तुम्हाला सर्वानाच माझ्या आजारपणामुळे खुप त्रास होतो.पण खरं सांगु, मला पण मंदारला भेटायचंय एकदा.कधी पर्यंत येईल तो?".मी काय सांगणार? काही तरी सांगुन वेळ मारुन नेली. तितक्यात त्यांच्या चेहर्यातील बदलाने मला लक्षात आलं की त्यांना पुन्हा शौचाला झालंय.मी त्यांना साफ करण्यासाठी नर्स ला बोलावू लागले.(डायलिसीस च्या दालनात आम्हाला हे करण्याची परवानगी नव्हती)बाबा म्हणे " नको बोलावू कोणाला, मला ती सर्वांसमोर उघडं टाकते साफ़ करताना आणि मला ते खुप दीनवाणं वाटतं, त्यापेक्षा मी असाच अजुन थोडा वेळ काढतो. एकदा रुम मध्ये आलो की कर साफ़". काय काय सहन केलं त्यांनी. अजुनही तेवढंच दु:ख आहे मनात..बाबांचे खुप हाल झाले.आयुष्यभर कोकणात पेशंट्ची सेवा केली. खुप कष्ट काढले पण आजारपण, हाल काही चुकले नाहीत.
२१ सप्टेंबर २००३ , रविवारी त्यांना आम्ही इस्पितळात आणलं होतं. अख्खा आठवडा संपत आला होता.एक दिवसाआड डायलिसीस चालु होता. दुसरा रविवार उजाडला. बाबाना बसवलं होतं बेड वर. आई त्यांचा चहा कपात ओतत होती. दाराचा आवाज झाला म्हणुन पाहिलं तर दारात दादा!!! त्याने धावत येऊन बाबांना कडकडून मिठी मारली.आसवांना मुक्त वाट दिली त्यादिवशी सर्वांनीच.भेटीलागे जीवा लागलीसे आस..खरंच अवर्णनीय होता तो क्षण..आस भागली होती.

बाबा प्रचंड खुष होते. दादाला लगेच सांगुन टाकलं , "तुझ्यासाठी मी २ कामं ठेवली आहेत.एक म्हणजे मोनुचं लग्न आणि मला घरी न्यायचं.हे कोणी माझं ऎकत नाहीत. तु ऎक.मला घरी ने."
माझं आणि अतुलचं लग्न ठरुन दीड वर्ष झालं होत. लवकरच लग्न करणारही होतो पण आता या कारणाने अतुलच्या एका दिवसाच्या सुट्टीत आमचं लग्न मंगळ्वारी ललिता पंचमीच्या मुहुर्तावर पार पडलं. त्याच दिवशी बाबांना घरी पण आणलं.बाबा खुष होते.
त्यानंतर त्यांनी जेवण बंद केलं. नकॊ आता काही म्हणायचे.आई,दादा, मी, मंजु सर्वाना बसवुन सांगितलं " मला खरंच तुमच्या सगळ्यां बरोबर रहायचंय पण आता शरीर साथ नाही देतेय.म्हणुन मी देवाकडे प्रार्थना करतोय की मला सोडव आता. तुम्हीही करा माझ्यासाठी."

शनिवारी, ४ औक्टोबर २००३ ,दसर्याच्या पहाटे २ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


.... मोनाली