Friday, October 19, 2007

ते ही नॊ दिवसः गतः

दिवाळीला यंदा देशात जायचं म्हणून खुप छान वाटतंय.तिथे दिवाळीची खरी मजा येते..उत्साह असतो, आनंद असतो. आपली लोकं असतात.वातावरण असत.आता घरची सुन म्हणून फराळ पण करायचा असतो. स्वतःच्या हातांनी करून सर्वाना खाऊ घालण्यात समाधानही असतं. पण आईच्या हातचा आयता फराळ खायला काय मजा यायची.लहानपणीची दिवाळीची ती सगळीच मजा आता नाही येणार. आता फक्त आठवायचं ते सगळं.
मी लहानाची मोठी कोकणात झाले.तिथे दिवाळी ही घाटावर होते तेवढी मोठी नसायची.पण आमच्या घरी व्ह्यायची मात्र मोठी. एकतर आमचं गाव गोव्याच्या खुप जवळ होतं. त्यामुळे आमच्याकडे शाळांना सुट्टी लागली की बरेच पाहुणे यायचे. गोवा, कोकण फिरायला म्हणुन. त्यामुळे घरी भरपूर मंडळी असायची.
नरक चतुर्दशीच्या पहाटे उठून अख्ख्या गच्चीच्या कडेने मेणबत्त्या लावायच्या.अंगणात पणत्या लावायच्या. घर कसं लख्ख उजळून निघायचं. घराचं ते देखणं रुप अजुन आहे मनात, डोळ्यात.
मग तेल, उटणं लावून अभ्यंगस्नान.अंगण खुप मोठं होतं त्यामुळे आईची रांगोळी पण भलीमोठी असायची. कधी विष्णूलक्ष्मी, शंकर पार्वती, गणपती असे बरेच देवदेवता तिच्या रांगोळीतुन उतरायचे अंगणात. तेही मोजक्या वेळात. फराळाआधी फटाके उडवणे कार्यक्रम असायचा. दादाचं बघून मीही हातात माळ पेटवून फुटायच्या आत फेकायची असले प्रयत्न करायचे.मजा असायची. फुलबाज्या पेटवून त्याची काडी वाकवायची आणि झाडावर फेकायची. कुणाची जास्त ऊंच जाते तो सही.

ते झालं की पुढची फराळाची तयारी. आई बाबा मुळात घाटावरचे असले तरी कोकणात रहायला येउन दशक लोटलं होतं. त्यामुळे कोकणातल्या रितीभाती आपोआप घरात आल्या होत्या. कोकणात दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळ तर करतातच पण नॆवेद्य असतो तो पोह्यांचा. त्याच असं आहे की त्या वर्षीचा भाताचा हंगाम नुकताच संपलेला असतो. त्या नवीन भाताचे पहिले पोहे देवाला ह्यादिवशी नेवेद्य दाखवूनच मग खाल्ले जातात. गूळ खोबर्याचे पोहे, फोडणीचे पोहे, हिंग खोबर्याचे पोहे असे बरेच पोह्याचे प्रकार केले जातात.त्यांचा आणि फराळाचा नॆवेद्य . सर्वात सही प्रकार म्हणजे हे पोहे म्हणजे आपले नेहमीचे दिसणारे पांढरे पोहे नसतात.हे लाल गावठी पोहे असत्तात. चवीला अत्यंत सरस ह्या नेहमीच्या पोह्यांपेक्षा.
आमच्या घरासमोरच एक पोह्याची गिरणी होती. दिवाळी जवळ आली की तिथे खुप गर्दी असायची. आम्ही मुलं खेळता खेळता त्या गिरणीत लपायलाही जायचो आणि येता येता काका मूठभर गरम गरम भट्टीतले पोहे द्यायचे हातात तेही खाऊन यायचो. खुप आवडायचे ते ताजे पोहे. (बहुतेक म्हणून ती जागाही आवडायची लपायला.गिरणी पण भली मोठी असल्याने कोणाला त्याचा त्रास नाही व्हायचा.आई बाबाच रागवायचे कधीतरी सारखे नका तिकडे जाऊ म्हणुन.) तर असा पोहे आणि चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळी असा सगळा फराळ व्हायचा.
संध्याकाळी लक्ष्मीपूजन असायचं. मस्त नवीन कपडे घालून मिरवायचं. बाकी पूजेपाशी माझी लुड्बूड नसायची.बाहेर अंगणात मॆत्रिणी किंवा आलेल्या पाहुण्यामधले समवयस्क मिळून धिंगाणा चालू असे. पाडव्याला मला लहानपणी काही खास मॊज वाटत नसे. सहाजीक आहे म्हणा पाडव्याची खरी मॊज आता. (कमाई असते ना...) आई छान छान पदार्थ करायची मात्र.बाबाही येइल त्याला आत बोलावून काही ना काही तरी खायला लावायचे. आमच्या घरासमोर एक गॅरेज होत. तिथे काम करणारी मुलं बाहेर गावची होती. ती दिवाळीला त्यांच्या घरी नसत जात. मग बाबा त्यांना घरी बोलवायचे फराळाला. खुश व्ह्यायची ती मुलं एकदम. आईच्या हाताला चवच तशी आहे म्हणा.
तेव्हा भाऊबीजेला मात्र खुप मजा यायची.दादाला तेल लावून अंघोळ.चांगला रगडून घ्यायचा माझ्याकडून.पण मलाही छान वाटायचं. मग ओवाळायचं, ओवाळणी घ्यायची. मजा होती.
अशी जायची आमची दिवाळी. जसजसे मोठे होत गेलो तसतशी दिवाळी बदलत गेली. आधी बाहेरगावी शिक्षणाला गेलो.काहीवेळा यायला नाही मिळायचं घरी दिवाळीला.नंतर सगळेच पुण्यात राहू लागलो.पुण्यात घरातले सगळेच असल्याने पुन्हा दिवाळी दणक्यात व्हायची.
आता देशाबाहेर असतो. घरी सगळं करते मी फराळाचं. मित्र, मॆत्रीणी जमतो, मजा करतो. पण मन मात्र आठवत बसतं ते दिवस. आता बांद्यातलं ते घर पण नाही आणि बाबाही नाहीत म्हणजे ते दिवस पुन्हा कधीच दिसणार नाहीत. म्हणून की काय माहीत नाही पण त्या आठवणी रम्य असूनही मन त्यात न रमता कातर होतं.
ते ही नो दिवसः गत:!!!!