Thursday, February 14, 2013

भय इथले संपत नाही


दादू,

 खूप दिवस तुझ्याकडे व्यक्त व्हायचा प्रयत्न करत होते पण डोळे इतके भरून यायचे की लिहीताच नाही यायचं. आज बघू जमतंय का.

खरं तर आधी बाबा आणि आता तू गेल्यावर मला घरातलं, कुणी अगदी जिवाभावाचं माणूस गमावण्याची भीती राहू नये असा वाटतं. हा घाव पचवायची,त्यातून कसबसं  सावरत उभा राहायची ताकद देव दयेने मिळाली पण झालंय उलट. हातातून अजून काहीतरी असंच निसटून जाईल की काय अशी भीती सतत नाहीतरी कित्येक वेळा वाटते. क्षणभंगुरता नावाच्या भीतीने मनात  एक मोठ्ठं घर केलंय. 'जीवन हे क्षणभंगुर असतं ' हे वाक्य पूर्वी घरातल्या वडील धार्या मंडळींच्या तोंडून खुपदा कानी पडलेलं, वाटायचं काय न ही मोठी लोक कथा कादंबरीतली वाक्य बोलतात , पण आयुष्यात सतत साथ देणारं ते  एकमेव शाश्वत सत्य आहे हे आता जाणवतंय. हे कळायला फार मोठी किमत मोजली रे आम्ही सर्वांनी दादू.

 आत्ता थोड्या वेळापूर्वी खिदळणारा दादू अकस्मात निपचित कसा काय होऊ शकतो? कुठे गेलं ते चैतन्य ? नक्की काय झालं ? आता पुढे काय? मंजू , ईशान , आई  ...  हजारो प्रश्न..... कशाचीच उत्तर कोणाकडेच नव्हती ... सगळे म्हणायचे काळ हाच उपाय ... पण तो उपायाचा काळ घालवणं  किती अवघड आणि असह्य वेदना देणारा. रोज  एक वेगळी आठवण. तुझं प्रत्येक नातं इतकं घट्ट  की आम्ही सगळेच जण तितकेच जबर जखमी .कोणी कुणाला सावरायचा हा प्रश्न. बाबांनंतर कसंबसं सावरलेलं घर पुन्हा एकदा कोसळलं. इतका तीव्र आघात आहे मनावर की ती रात्र, तो दिवस जात नाही डोळ्या समोरून. आता घट्ट असणारं मन  कधी हळवं होतं कळत नाही. एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं  तर मग हा सगळा आटापिटा कसला? का उभं  राहायचं  आणि कशामागे धावायचं आम्ही पायात ताकद नसताना ? वेडे वाकडे विचार मनात थैमान घालत होते.पण आम्ही प्रत्येक जण एकमेकांना सावरत होतो त्यातून स्वतःच सावरले जात होतो. सावरणे हा शब्द याच संदर्भात बहुतेक वेळा वापरला जातो. फार खटकायचा हा शब्द तेव्हा. आता कळतंय की  तू आता कधीच दिसणार  नाहीस , आमच्याशी बोलणार नाहीस हे सत्य मान्य करणं आणि मग ते दिवसें दिवस अंगवळणी पाडणं म्हणजे सावरणं.तुझ्या शिवाय जगण्याची सवय करणं हे सावरणं. तू नसल्याचा दु:ख कधीच कमी होणार नाही पण त्या दु:खासहीत जगायला शिकणं म्हणजे सावरणं.  सर्वांना वाटतं  दिवसातल्या रडू यायच्या घटका कमी झाल्या की  सावरले असं म्हणायचं.तेव्हाच मला कित्येक लोक म्हणाले कि तू पटकन सावरलीस.... हो ना डोळे सावरले हो मी मनाचं काय? 

आता एक वर्ष होऊन गेलं या घटनेला पण मनातली ती भीती, तो थरकाप कायम आहे. अशाश्वतता प्रत्येक पुढे जायच्या मार्गात भीती दाखवते. पुढचा श्वास आहे कि नाही याची खात्री नाही आणि पुढचे मार्गक्रम आखायचे? आणि आपणही असेच अचानक निघून गेलो तर उरलेल्यांनी त्या भग्न स्वप्नांची आठवण काढत आसवं गाळायची. मग का बघायची एकत्र  स्वप्नं आणि का रचायचे मनोरे  ? हे सगळे प्रश्न पडतात. पायातली ताकद कमी होते , हो पण काही काळापुरतीच. मनच मनाला समजावतं. जेव्हा जाऊ तेव्हा जाऊ त्यासाठी आत्ताचे चांगले दिवस का हातातून निसटू देतेस आणि भूत काळातली दु;खं, भविष्याच्या चिंता सोडून हा क्षण  सोनेरी बनवू  असा कौल मिळ्तो  मनाचा.तुझी उत्स्फूर्तता , तुझी चिकाटी सगळा आठवतं .पुन्हा मन भरारी घेतं.आई म्हणते कि मंदार शिवाय जगण्याला पर्याय आहे का आपल्या पुढे? नाही नां मग जगायचं तर उमदे पणाने जगा .रडत खडत नाही. पण माहितीये,मजा करण्याचा अट्टाहास होता तू असताना, आता प्रयत्न करतोय आम्ही. कधी जमतं कधी फसतं तर कधी आत्ता लिहायले  बसले तेव्हासारखं धास्तावतं आणि म्हणतं 'भय इथले संपत नाही,मज तुझी आठवण येते '. या भयावर मात करायची ताकद दे रे आमच्यात तरच पुढे जाऊन काहीतरी घडू शकेल हातून.

तुझी
मोनू