Tuesday, May 19, 2020

राघवशेला



कोरोना मुळे जगभरात पसरलेल्या एक भीतीच्या सावटाखाली आपण सारे सध्या जगतो आहोत. जोपर्यंत त्यासाठीची  प्रतिबंधात्मक लस, किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास हमखास लागू पडणारे औषध सापडत नाही तोपर्यंत तरी हे संकट असेच जगाला जायबंदी करत राहील असं एकुणात दिसतंय. ही परिस्थिती बदलण्यासाठी कोणत्याच देशाकडे सामाजिक अंतर  पाळण्या व्यतिरिक्त काही ठोस उपाय दिसत नाहीयेत. सगळी सरकार स्वतच्या परीने यावर तोडगे काढायचा प्रयत्न करताहेत. त्यांची त्रेधतिरपीट उडते आहे हे नक्कीच. एरवी प्रेरणादायी, उदबोधक ठरणारी बऱ्याच राजकारण्यांची भाषणं प्रभावी होत नाहीयेत. भविष्याच्या चिंतेने किंवा सद्य परिस्थितीत असलेल्या आव्हानामुळे  आपण थोडे का होईना भयभीत होतोच आहोत. पुढे काय, कसं आणि कधी हे प्रश्न सध्या कोणालाच उमगत नाहीयेत. आणि हे प्रश्न n पडायला आपण लहान पण नाही राहिलो आता.

लहान असतो ना तेव्हा वाटत असतं काही झालं तरी आई बाबा आहेत तोपर्यंत आपण सुरक्षित. आई बाबा सुद्धा परिस्थिती पुढे हतबल होऊ शकतात याची सुतराम कल्पना नसते. बाबांनी दिलेला शब्दिक आधार, कधी आईने स्वतः पुढे होऊन सोडवलेले त्यावेळी बिकट वाटणारे प्रश्न याने वाटत असतं की आई बाबा सगळं बघून घेतील. माझ्या आवाक्याबाहेरचे सगळे प्रश्न सोडवायला हे दोघे आहेत ना मग कसली काळजी ..तत्पर्याने तुमचा राघवशेला तुमच्या बरोबर असतो तोही सगुण रुपात.  ग्रेस म्हणतात ना "सीतेच्या वन वासातील जणू अंगी राघव शेला" अगदी तसा.

हळूहळू मोठे होतो, परिस्थिती, प्रसंग बदलतात. एखादा प्रसंग असा येतो की वडीलधाऱ्या मंडळींना पण परिस्थिती समोर हतबल झालेले बघतो आपण...
 बाबांच्या चार वर्षांच्या प्रदीर्घ आजारपणात कित्येक वेळा मी तो क्षण अनुभवला. तीव्र वेदनेने व्याकुळ त्यांचा चेहरा,  हा आजार कमी न होता वेगवेगळी भयानक वळणं घेणार आणि अखेर त्यांच्या सोबतच संपणार हे  त्यांनी स्वतः सांगितल्यावर पायाखालची जमीन सरकली होती... पुढचा प्रत्येक दिवस अनेक हतबल प्रसंग अनुभवत गेला. भय इथले संपत नाही हे मनोमन पटलं तेव्हा. एका सगुण शक्तीचा (बाबा) आधार घेत पुढे बिनधास्त चालणारी मी अशक्य डळमळले.  कोणताही माणूस परिस्थिती पुढे अगतिक होऊ शकतो या अनुभवाने आतून बाहेरून हादरले होते. निर्गुणाची ओळख अजुन व्हायची होती. त्या निराकार शक्तीवर अजुन विश्वास नव्हता. मग एखाद्या  भयावह प्रसंगातून जाताना आंतरिक ताकद देणारा तो राघवशेला कुठे होता साथीला.

हळूहळू बाबांच्या आठवणी ताकद बनू लागल्या. जगरहाटी चालू ठेवणाऱ्या त्या अज्ञात शक्तीवर विश्वास बसू लागला, त्यानंतर जी वेळोवेळी माझा राघवशेला बनते. ती अज्ञात शक्ती आपल्या समोर असलेलं आव्हान बदलत नसते तर आपल्याला त्याला सामोरं जाण्यासाठी सशक्त, समर्थ बनवत असते. आव्हानं साखळीने येत राहिली त्यामुळे याचा प्रत्यय अनेकदा आला.

हे सर्व पुन्हा प्रकर्षाने जाणवलं कोरोना मुळे. अवघं जग हतब ल आहे सध्या. हे केलं तर असं होईल का, मुलाची शाळा तर सुरू होते पण पाठवून काही चूक करत नाही ना आपण, एक ना दोन... ढीगभर शंका कुशंका...अशा भीतीच्या परिस्थितीतून चिकाटीने पुढे जाताना  आपल्या मनातला एखादा राघवशेला हा दुर्गम प्रवास थोडा सुगम करेल असं वाटतं.  राघवशेला जो प्रत्येकाचा वेगळा असेल. अगदी काहीही असू शकेल. पण सर्वात महत्वाचं आपण निष्ठेने त्याच्या साथीने मार्गक्रमण करत राहणं. सीतेने राघवाच्या शेल्याच्या  ( खरंतर हनुमानाने दिलेल्या अंगठीच्या) आधाराने रावणाच्या कैदेतील दिवस कंठले.  आपण आपल्या मनातील राघवशेल्याच्या आधाराने lockdown आणि त्यानंतरचा काळ व्यतीत करू शकू ना?

अदिती हिरणवार

Saturday, May 2, 2020

जीवनगाणे आनंदाने गाणारी आजी


( यमू आजी , आईची मावशी)

कित्येक वर्ष मला माहीतच नव्हतं की यमु आजी माझी खरी खरी आजी नाहीये म्हणजे आईची आई नाहीये. अजूनही आठवतं, खूप वाईट वाटलं होतं मला की का ही माझी सख्खी आजी नाहीये. सुट्टीला, लाड करून घ्यायला तर इथेच येतो , आई पण यालाच माहेर म्हणते मग अजुन काय असतं सख्खी आजी म्हणजे. आईची आई असायला लागतं हे लक्षात आलं नव्हतं. कारण आजी ने कधी हे जाणवू दिलं नव्हतं.
जसा सौरभ तसेच आम्ही दोघे असायचो सुट्टीला गेलो की. खूप दंगा करायचो म्हणून एकत्र शिक्षा असायची. आम्हाला शिक्षा केल्यावर ती कोणाला तरी का केलीय हे सांगतान आजीला गालातल्या गालात बारीक हसू फुटायच.
ते हसू अजुन लक्ख आठवतं. नानांनी आजीशी प्रेमविवाह केला तो या लाजवाब हास्यामुळेच असेल😍

थोडी मोठी होऊ लागले तशी आजी कळायला लागली. आईकडून तिची आधीचा जीवनपट कळाला होता आता स्वतः अनुभव घेत होते. बाबा आजीकडे कधीही जाऊन पोचले तरी हसतमुख स्वागत आणि मस्त तुपातला खमंग शिरा हे होणारच. दुखरी कंबर घेऊन , ओट्याचा आधार घेऊन उभी राहायची पण करू नको म्हणलं तर म्हणायची मोहनराव तुम्ही थोडीच रोज येताय... काही नाही होत एवढ्याश्या ने. किती लहान कृती होती पण मनावर कोरली गेली. संस्कार असेच घडत असतील बहुदा...
मी दहावीला असताना शकुमावशी आजारी पडली. पूर्णतः जागेवर होती ती. नानांच्या मदतीने आजी तिचे  सगळं जागेवर पण शिस्तीत करत असे. सहा बाळंतपणाने हल्लख झालेली कंबर घेऊन त्या वयात जागेवर असणाऱ्या मोठ्या मुलीची शुश्रुषा करणं सोपं नव्हतं. तिने तेही निकराने केलं. खूप आधीपासून अवगत होती तिला ही कला. स्वतःला त्रास होतोय तरी दुसऱ्या साठी करायचं कारण आपण नाही केलं तर तिला दुसरं कोण आहे. माझ्या आईची दोन्ही बाळंतपणं तिने अशीच केली. आईला दुसरं माहेरच नाही आणि तिची डॉक्टर सांगलीत. अण्णा आजोबांनी एकदाच आजीला म्हणलं की तिला येऊ देत तिला दुसरं कोण आहे..  असं म्हणाल्यावर आजीने आईला दोन्ही वेळेला सांगलीत घरी आणून तिची बाळंतपणं निगुतीने केली. दुसऱ्या वेळेला तर माझे आजी आजोबा ( बाबांचे आई बाबा)जे अतिशय म्हातारे होते आणि त्यांचं  माझ्या आईशिवाय कोण करणार म्हणून तेही म्हणे आजीच्या घरात एका खोलीत राहायला आले होते. हा तर कळस होता अण्णा आजोबा, नाना आणि आजीच्या चांगुलपणाचा. स्वतः पुरतं न बघता समोरच्याची अडचण समजून त्याला आधार देण्याची असामान्य कुवत. आणि हो ही कुवत मनाची लागते बाकी सर्व गोष्टी आपसूक मार्गी लागतात.

कुटुंबातील सर्वांचे हवे नको बघताना मनाला ताजं टवटवीत ठेवतो तो आपला आवडता असा एखादा विरंगुळा. विरंगुळा म्हणून चालू केलेलं कीर्तन आजीला किती बक्षीसं, सन्मान घेऊन आलं. जे करेल त्यात भराभर पुढे जाणं हे तिचं खास वैशिष्ट्य. थोडे थोडके अडथळे तर ती कधीच पर करून जात असे. भीड भाड ना बाळगता चार लोकांशी बोलून, अडचण सांगून त्यावर उपाय मिळवत राहायचं. रडत कुढत बसणे वगैरे तर माहीतच नसेल बहुदा. तिच्या वृद्धावस्थेत तिला वरच्या मजल्यावर काही दिवस राहावं लागलं. आधी थोडी वैतागली की आता कीर्तन बंद, गुडघे दुखतात तर खाली जाणार कसं म्हणून. पण पुन्हा भेटली तेव्हा जिन्यातच होती, मला वाटलं वर जातेय कारण तशी उभी होती पण नाही , उलट उतरलं की गुडघे दुखत नाहीत म्हणून उलटी उतरत होती कारण भजन कीर्तनाला जायचं होतं. असे हे उपाय शोधणे आणि आनंद मिळवणं.

दादा आणि मी पुण्यात दोघेच राहत होतो तिथे नाना आणि आजी आवर्जून राहायला आले होते. खूप मस्त वाटलं आम्हाला. मी स्वयंपाक करून वाढायची ते आवडीने खायचे. मी बाहेर गेलेली असताना दुधाच्या ऐवजी आजीने ताक घातलं चहात. नाना म्हणाले की अग चहा वेगळा लागतोय तू काय घातलं... तर म्हणे इथे जे काय होतं ते घातलं, जाऊ देत आता प्या आहे तसा. ... मी आल्यावर काय धमाल हसलो सगळे मिळून.त्यांच्या तरुणपणी तरकट असणारे नाना आता किती हसून सांगत होते हे सगळं. आजी नाना , भिन्न स्वभाव पण काय लोणचं मुरल होतं.किती सांभाळून राहत एकमेकांना . भांडणं वादावादी चालायची पण मधेच काहीतरी विनोद करून दोघेही हसायचे. आजीला आलेलं हसू ही एक अनुभवायची गोष्ट होती.. एका सुरात म्हणलेल त्यांचं करुणाष्टक कानात आहे अजुन, प्रसंगी हळवं करतं मला. त्यांचा आधार आत्ता असता तर असं वाटून.

बाबा गेल्याचं कळल्यावर आजी नाना राहायला आले होते. आईच्या बाजूला तेव्हाही आजी उभी होती. थकली होती शरीराने तशी. बसून बसून सर्वांना काय करायचे काय नाही याचं मार्गदर्शन करत असे.  तेव्हा मी तिला ओट्यापाशी खुर्ची देऊन, बाकी सगळी तयारी करून, डाळ वांगं करायला लावलं होतं. अफलातून चव.  साधे पदार्थ वापरून अशी चव कशी आणायची तिची तीच जाणे.
आईची एकसष्ठी केली तेव्हा तिला निरोगी दीर्घायुष्य चिंतण्याप्रीत्यर्थ सत्यनारायण केला होता. आईच्या पोरक्या आयुष्यात मायेची पखरण करणारी आजी म्हणून सत्यनारायण आजी नानांच्या हस्ते पुजला. आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यायला समस्त मावस मंडळी उपस्थित होती त्यामुळे आईही मनापासून आनंदली.
आजी शेवटची काही वर्ष जागेवर होती पण असली भन्नाट तेजस्वी दिसायची.  नाना, शाम मामा, सृजा मामी, मुलं यांनी खूप मनापासून सगळं केलं तीचं. आईला "कुसुमे तुझी एखादी सुती साडी आण गं, मला पांघरायला आवडते " म्हणायची.  आजी, आई, मावशीने वापरलेल्या सुती साडीत ऊब असतेच, तीच आजीला आईच्या साडीत मिळायची बहुदा. तिची खरी नव्हे पण तशी म्हणलं तर मोठी लेकच माझी आई. आजीचे बरेचसे गुण आईत तंतोतंत उतरले होते. प्रसन्नता, उरक, उत्साह , पाककला, आहे त्याच्यात समाधानी तर राहायचं पण पुढे काहीतरी करत राहण्याची धडपड, सगळं तसं. या दोघी मावशी भाचीला काहीसं अनवट चालीचं जीवन गाणं आलं पण काय सुरेल गायलं त्यांनी🙏