Saturday, April 4, 2020

सूर सखा



ऑगस्ट 2018. आई UK madhe होती माझ्याकडे. आजारी होती, हॉस्पिटल ला तपासण्या चालू होत्या. 80% कळलं होतं की रक्ताचा कर्करोग आहे. अशावेळी हॉस्पिटल मधे जाता येता होणारे गाडीतले प्रवास anxiety वाढवणारे असायचे.पण हे  प्रवास सुसह्य केले राहुलच्या गाण्याने.  त्याच काळात Rahul Deshpande tyacha audio blog karayacha. Mi कायमच सगळे भाग ऐकायची पण विशेषतः तेव्हा आलेला गुरुजी भाग 3 ने मला वेड लावलं होतं. त्यातला सुरवातीलाच गायलेला रागेश्री मधला तराणा .. अहाहा काय तो आवाज, भेदक सूर, सुरेल ताना आणि त्यातून तो तराना त्यामुळे अधिकच आवडला. राही रागाची सुरावट सुधा अप्रतिम. तर मी प्रत्येक वेळी जाता येता हा ब्लॉग गाडीत लावायची. हॉस्पिटलला जाऊन काय ऐकायला मिळणारे, किती वेळा आईला सुया खुपसून घ्यायला लागणारेत, येताना आलेली भकासता, उद्विग्नता, खिन्नता सगळी मी आणि आईने या गाण्याच्या जीवावर पेलली. हेच लावून कधी गाडीत ढसढसा रडलो तर कधी धीराने सामोरे गेलो. संगीताची ताकद. त्यातून कलाकार  इतका तयारीचा असल्यावर काय हवं. राहुल, माझ्या आयुष्यातल्या अशा अनेक आव्हानांना सामोरं जाताना तुझं गाणं बरोबर असतं आणि ते हा प्रवास कधी सुसह्य, सुखकर, अविस्मरणीय तर कधी आनंददायी करतं.  जसा माझा नवरा, माझे नातेवाईक,मित्रमैत्रिणी माझ्या बरोबर माझ्या प्रसंगात असतात तसाच आधार आणि सहभाग तुझ्या गाण्याचा असतो तुझ्या आत भिडणाऱ्या आवाजाचा असतो. तुझ्या या योगदानासाठी मनापासून धन्यवाद आणि त्यासाठीच हा लेखप्रपंच.

साधारण 2000-2001 सालची गोष्ट असेल. झी मराठी वर सूर ताल नावाचा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम लागायचा. बाबा आजारी असायचे पण रोज सकाळी आणि संध्याकाळी न चुकता दोन्ही वेळचा कार्यक्रम पाहायचे. बऱ्याचदा संध्याकाळचा रिपीट telecast असे. आजचे प्रस्थापित मराठी गायक गायिका तेव्हाचे उभरते कलाकार होते आणि त्यांच्यासाठी हा एक चांगला मंच होता. एक दिवस सकाळी कॉलेजला जाण्यासाठी आवरता आवरता एक  किंचित अनुनासिक पण थेट काळजाला भिडणारा आवाज ऐकू आला...एक मुलगा वसंतरावांचे गाणं गात होता. पळत येऊन पाहिलं तर बाबा म्हणाले हा राहुल देशपांडे, वसंतरावांचा नातू. अजुन विशी सुधा पूर्ण न केलेला हा उमदा युवक.
त्याचं गाणं, त्याचा आवाज, हातवारे, गाताना मधेच नाजूक हसणं सगळच फार भावलं. त्याचं गाणं सूर ताल मधे लागताच असेन तिथून धावत येऊन ऐकू आणि पाहू लागले.

सवाई गंधर्व पाहायला गेलं की मी तबलजी आणि त्यांच्या "अदा"   यावर किती जीव टाकायचे घरातल्या सर्वांना माहीत होतं. पण आता एखाद्या गायकासाठी, त्याचं गाणं ऐकायला आणि तो तल्लीन होऊन गाताना ते पाहायला मी तशीच वेडी होत होते. आई बाबा वसंतरावांच्या गाण्याचे निस्सीम चाहते त्यामुळे त्यांची गाणी लहानपणापासून कानावर पडलेली , ती आता राहुल गात होता. जाम आवडत होता आम्हा सर्वानाच. माझ्यासाठी सचिन तेंडुलकर ला सॉलिड competition  आली होती. सचिन ची मॅच आणि राहुलचं गाणं मी चुकवत नव्हते.

बाबानाही राहुलचं गाणं भारी आवडायचं.  म्हणायचे राहुल ने आजोबांची गाणी जरूर गावीत पण त्यात अडकून पडता नये. गळा अजुन तयार करून सुसाट सुटला पाहिजे. आजोबांची  गाणी स्वतःच्या शैलीत गायला हवी त्याने. अर्थातच राहुल पण तयारी करत होता. त्याला पुलं सारखे आजोबा, बापू काका सारखे कानसेन वडील, तज्ञ आई आणि एकाहून एक तरबेज गुरू होतेच की. प्रत्येक पुढचा कार्यक्रम पहिल्यापेक्षा सरस होत होता. आजोबांच्या शैलीचा हात धरून वर आलेला राहुल  हळूहळू स्वतःची शैली, ठसा उमटवत होता.  माझंही वेड वाढतच होतं. मी ही गाणं शिकत होते माझ्या आईकडे. बगळ्यांची माळ फुले तेव्हा डोक्यावर सवार होतं. ते गायचा पुरेपूर प्रयत्न चालू होता माझा. गळ्यातून उमटत नसली तरी त्या गीताची प्रत्येक जागा, प्रत्येक सूर कानात होता. इतक्या वेळा ते गाणं म्हणायचे मी, आई पेटीला आणि मिलिंद तबला घ्यायचा वाजवायला, माझी वहिनी मंजु,  ईशान chya वेळेला प्रेग्नंट होती तेव्हा. ती म्हणू लागली माझं बाळ जेव्हा जन्माला येईल तेव्हा रडण्या ऐवजी नक्की बगळ्यांची माळ फुले म्हणणार😁 सांगायचं असं की एवढं राहुलच्या आवाजाने त्याच्या गाण्याने माझ्यावर गारूड केलं होतं.

पुढे मी UK ला आले आणि संगीताच्या लाईव्ह कार्यक्रमांना पारखी झाले. पुण्यातली ही हिरवळ मात्र जगात कुठे सापडेल असं वाटत नाही. आठवड्याला एखादा संगीताचा कार्यक्रम पाहणारी/ ऐकणारी मी आता वर्षभरात एखादा पाहू लागले.तेव्हाच राहुलची काही गाणी ऑनलाईन सापडली. पण ऑडियो.अजुन YouTube yet hota. त्यात मारूबिहाग मधली चीज होती, " मै पतिया लिख भेजू". अहाहा काय सुरेख म्हणाली होती राहुल ने. याड लावलं मला तिने. दादाला पण ऐकवली, पाठवली तो पण येडा मग त्याचा😃

एक दोन वर्षात भारतवारी मधे कट्यार पहायची संधी मिळाली. जाम आवडला नाटक.एकदा बघुन समाधान होईना पण नाही मिळालं पुनः पाहायला. राहुल च गाणं तर आवडतं पण अभिनय जमेल का.. असं वाटणाऱ्या सर्वांना त्याचं काम नाटक गाणं सर्व काही आवडलं.  राहुलचं प्रयोगशील असणं जबरी भावलं मला. खरं पहायला गेलं तर ती जोखीम होती त्याच्या गाण्याच्या करियर वरती घेतलेली पण ती त्याने उचलली आणि यशस्वीरीत्या पार पाडली. चुका होणं साहजिक पण त्या सुधारण्यासाठी परिश्रम घेत राहणं हे त्या पुन्हा न होण्यासाठी प्रचंड महत्वाचं. राहुल ने नेमकं हे पकडलं. चुका होण्याच्या, अपयशाच्या भीतीने प्रयोगशीलता नाही मारली. एखाद्या उभरत्या कलाकारासाठी धाडसी पायरी असणारे ती.  कसोटी लागली असेल पण अशाच वेळेला स्वतच्या कौशल्यावर आणि मेहनतीवर पाय रोवून उभा राहू शकला तो राहुल.

 आज त्याचा गळा, त्याचा सूर वयाप्रमाणे प्रगल्भ होतोय हे स्पष्ट जाणवत. सतत काहीतरी नवीन सुचत , दिसतं ते प्रयोग करत असतो , काहीवेळा डोक्यात सुचलेल्या विचाराला गळा साथ देत नाही असं प्रांजळपणे कबुल करतो. पण दुसऱ्या क्षणी विजेसारखा कडाडतो. कधी नाजूक लयदार तान तर कधी बरसणारा मेघ.आत खोलवर पोचणारा सूर. जीवघेणी सुरावट आणि त्यात प्रसन्न मुद्रा घेऊन गाणारा राहुल.   नरसोबाची वाडी ला जेवणारे भटजी जसे मांडी घालून दोन्ही पायांच्या पुढे मधोमध डावा हात पालथा ठेवून उजव्या हाताने श्रीखंड चोपतात, तशी एक लकब आहे राहुलची. तसाच बसून दोन्ही हात पुढे पालथे घालून खांदे उचलून ठेवणीतल्या पल्लेदार ताना घेत असतो.  गाण्यातील एखादी नाजूक जागा घेताना उजवा  डोळा बारीक मीचकावतो, हातांची दोन बोटं पुढे नेत त्या लकेरीतील नजाकत उलगडून दाखवतो आहे असं वाटतं. ओयेहोये क्या बात है.. दिलं खुश हो गया तर अलिकडच कैवल्यागान ऐकुन कातर होतं मन. कुमार गंधर्व यांची अजरामर केलेली निर्गुणी भजनं, गझल, भजन, नाट्यसंगीत, अभंग, भावगीत असे सुगम संगीताचे अनेक प्रकार तो आवडीने ताकदीने गातो. जुन्या संगीत नाटकांना पुन्हा रंगमंचावर आणून तरुण पिढीला आपल्या संगीताची झलक दिली.   वसंतोत्सव सारखा गाण्याचा उत्सव सुरू केला.सर्वांना विनामूल्य प्रवेशिका असतात.  मला ही गोष्ट फार आवडली. त्याला कारण असं की शास्त्रीय/अभिजात  संगीत हे पैसेवाल्या लोकांनाच उपलब्ध आहे असं नाही तर संगीताचा खरा चाहता ते ऐकू शकला पाहिजे. भारतीय संगीताचा प्रसार करण्यामध्ये याचा वाटा नक्कीच मोठा ठरेल असं आपलं मला वाटतं. मी जेव्हा पुण्यात शिकत होते तेव्हा कितीही वाटलं तरी सवाई किंवा इतर मोठ्या कार्यक्रमाची तिकीट आम्हाला परावडायची नाहीत, कोणी आतून मानाचे फुकट पास मिळालेली लोकं बाहेर आली की आम्ही ते पास मागून आत जाऊन उरलेला कार्यक्रम पहायचो. जगजीत सिंग यांचा एक  गणेश कला क्रीडा मधला कार्यक्रम तर अख्खा बाहेर गाडीवर बसून ऐकला आम्ही सर्वांनी. आत जायला तेव्हाच ५०० रुपये तिकीट.  त्या धर्तीवर मला हा राहुलचा उपक्रम स्तुत्य वाटला. त्यातून गाण्याचे कार्यक्रम त्याने फक्त पुण्यापर्यंत मर्यादित न ठेवता नाशिक, सातारा, कोल्हापूर येथे वसंतोत्सव करून पोचवले.
साताऱ्याच्या वसंतोत्सवातील गाणी YouTube var tyachya channel var आहेत.
 अतिशय अप्रतिम आणि तयारीच गायला आहे त्यात राहुल. अमर ओकची बासरी, आदित्य ओक ची हार्मोनियम ची साथ सहज सुंदर. पण मोहक आहे ती सरोद वादनाची साथ. कलाकार मला माहितीचा नाहीये. राहुलच्या गाण्यात मधेच सरोदचे सूर गाण्याला अशक्य उंचीवर नेतात.  असं कौशिकीच्या एका मैफिलीत अनुभवलं होतं. राहुलची मैफिल तशी पाहून ही टॉप फॅन एकदम खुश.

सध्या फेसबुक लाईव्ह मुळे राहुल बऱ्याचदा दिसतो, त्याचं गाणं virtually live aiku शकतो हेही नसे थोडके.

राहुलला मिळालेली आवाजाची देणगी, त्यावर घेतलेली अपरिमित मेहनत, गाण्यातला, सुरातला आणि विचारातला सच्चेपणा त्याची कारकीर्द यशस्वी आणि झळाळती करेल यात शंका नाही. पण याच सर्व गोष्टी त्याला ऐहिक सुख, कीर्ती यांच्या पलिकडे जाऊन संगीतातून मिळणारा परमोच्च आनंद ही मिळवून देतील.
आमच्या सारख्या असंख्य लोकांना त्याच्या या कलेने आनंद, उमेद अशीच सतत मिळत राहो🙏

राहुलचा YouTube channel://www.youtube.com/channel/UCD-gpX6FMfs3M4mhLsz8Wkw

Listen to Audioblog 21 (Season 2) Guruji Part 3 by Rahul Deshpande on #SoundCloud

अदिती हिरणवार

जिएं तो जिएं कैसे बिन आपके

तुझ्याशिवाय मी नाही राहू  शकणार असं मला अतुल भेटल्यावर म्हणालेले बाबा, खरंच नाही राहिले आमच्या लग्नानंतर. खूप मनाची शक्ती लागली बाबा गेल्यावर त्यातून वर यायला. कित्येक रात्री मधेच जाग यायची आणि मग बराच वेळ रडत जायचा. त्यांचा सगळा त्रास आठवून खूप कासावीस व्हायचं. आईला त्रास होईल म्हणून काहीच नाही बोलायची तिला. आणि तीही मला. दादा दुबई मधे, त्यामुळे तो आणि मंजू पण वेगळेवेगळे. आता मागे पाहिल्यावर वाटतं किती खडतर होते ते दिवस आपल्या प्रत्येकासाठी.  मुन्ना राण्या, मोनू, काय आणि काय. घरात तुझी किलबिल नसेल तर ते घर कसं होईल म्हणायचे बाबा. तेव्हा तुम्हा तिघांशिवाय हे घर
असू शकेल याची कल्पनाही नव्हती केली मी.
खूप मेहनत घ्यावी लागते आहे स्वतःवर तुम्हा तिघांशिवाय जगताना...

सण तर प्रचंड घालमेल करतात मनाची.आपण सण किती उत्साहाने साजरे करायचो. प्रत्येक सणावर एक लेख होईल इतके भरगच्च असायचे सण. आणि हो दिमाखात असायचे पण पैशाच्या नाही तर माणसांच्या .  गणपती, नवरात्र दसरा नुसती धमाल. सगळे जण आपापल्या परीने कामाला लागायचे. कोजागिरी जवळ आली की हमखास हुरहूर लागते माझ्या मनाला. आपल्याकडे वाढदिवस साजरा करत नाहीत म्हणून कोजागिरीच्या निमित्ताने चमचमीत खायला काहीतरी आणि  मसाला दूध करून सगळे एकत्र बसून प्यायचो. नंतर काणेकरांच्या घरी संगीत रजनीला जायचो. तुम्ही सांगायचा की घरी झोपा तुम्हाला झोप येईल पण तो लाईव्ह संगीताचा आवाज ऐकायला तेव्हाही आवडायचा म्हणून यायचो, मग झोप यायची मग बाबा घरी आणून सोडायचे. पुढे पुण्यात मस्त मित्रमंडळ जमवून मिसळ किंवा पावभाजी , पुलाव मसाले दूध करून रात्रभर गाणी म्हणत जागवायचो. सकाळी उठून सगळे आपापल्या कामावर. इतक्या असंख्य कोजागिरी  डोळ्यासमोर येतात अशा. आणि अशा दिवशी आपला वाढदिवस इतक्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होतो या कल्पनेने कोजागिरी  पौर्णिमेला माझ्या मनात एक विशेष स्थान आहे. अलीकडे काही वर्ष एक मित्र परिवार जमून गाणी म्हणत नसू तर ऐकत छान साजरी करतो कोजागिरी. नाहीतर भारताबाहेर आल्यापासून  या  सर्वाला पारखं झाल्यासारखं  वाटायच.  माझ्या मनातली कोजागिरी कशी सापडणार मला इथे. माझ्या शिवाय कोणाला माहीत पण नव्हतं की मी काय शोधतेय त्या दिवशी किंबहुना त्या रात्री.  सगळे जमलोय,निखळ दंगा चालू आहे,  चविष्ट खादाडी चालू आहे, कोणीतरी मधेच गाणं म्हणायला चालू करतय, कोण तबला काढताय, पराग गिटार ची अप्रतिम साथ देतोय, श्रुती, श्वेता नृत्य करताहेत... अहाहा... एकातून एक गाणं सुचून कधी पहाट होतेय कळत पण नाही. आता कुठे तासभर झोपणार चला सकाळची गाणी म्हणू असं करत अंघोळ करायच्या वेळेपर्यंत गाण्याचा यज्ञ चालायचा. या रात्रीची आठवण काढत अख्ख वर्ष जायचं आणि दसरा झाला की  मंडळी पुढची कोजागिरीच्या तयारीला लागायची. काही मंडळी गळायची, काही नवीन यायची पण कोजागिरी साजरी व्हायची. वयामुळे असेल पण तेव्हा जागरण म्हणजे अस्स करायचो. आता जमलं असतं का?  आता वाटतं मी पुण्यात असते आणि दादा असता तर केली असती  कोजागिरी तशीच साजरी... आम्ही दोघेही भावंडं असल्या मजेला नेहमीच एका पायावर तयार म्हणा. आतातर अनिल, सानु, ईशान हे नव्या दमाचे कलाकार पण आहेत.काय रंगली असती कोजागिरी...मुख्य माणूसच नाही ना पण...उत्साह मूर्ती माझी.

 दुसरी उत्साह मूर्ती तर केवळ अशक्य..... तीही अशीच अचानक निघून गेली या जगातून.. ऑफिसमधे तुफान काम असू देत  त्याच्यावर पण नंदन दादा थकला आहे आणि त्याला दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळ करायला यायला उशीर झालाय हे शक्य च नाही... पटापट पायऱ्या चढत, एखादं सुंदर गाणं म्हणत स्वारी घरात शिरणार. एक एक करत सगळे हजर vhyache, २०-२५ जण असायचो. गणपती मंदिरात सर्वांनी मिळून घेतलेलं दर्शन, घरी येऊन आईच्या हातचे खमंग फोडणीचे बांद्याचे लाल पोहे, गुळपोहे, दहीपोहे, आणि सर्वांचा फराळ असा थाट असायचा. पुष्पा ताईच्या चकल्या खात खात त्यावर काहीतरी विनोद चालू असायचे. आई आम्हा सर्वांना त्या दिवशी ओवाळायची ... खूप भारी वाटायचं मला ती ज्योत आपल्यासमोर ओवाळलेली पाहून. इतकं पोट भरायच की सगळे म्हणायचे आता काही जेवण वगेरे नको. काहीतरी थट्टा मस्करी सुरू असायची. एवढ्यात कुठेतरी जाऊया अशी टूम निघायची. १०-१२ दुचाक्या निघायच्या. भटकत भटकत शेवटी स्वारी भोज्याला पोचायची म्हणजे एखाद्या हॉटेलात. अवधूत काका आणि ज्योत्स्ना ताई बँकेच्या दिवाळी बोनस चा भाग आमच्या त्या वेळेच्या पार्टी वर खर्चायचे. तिथून भरपेट खाऊन तृप्त होऊन सगळे पुन्हा घरी यायचो. चक्क सगळे बाहेरच्या खोलीत जमेल तिथे आडवे व्हायचो... ज्येष्ठ मंडळी डुलकी काढीत पण आमची कुजबुज चालू असे. थोड्या वेळात चहा टाका घरी लक्ष्मीपूजन करायला जायचंय अशी मागणी करण्यात यायची. चहा पिऊन या अशक्य सुंदर मैफिलीची सांगता व्हायची.
आधी बांद्यात असताना तिथेही खूप धमाल केली दिवाळीला. खूप माणसं आणि त्यातून आम्ही सगळी मुलं एकत्र दंगा घालायचो नुसता. मला सांगा इतक्या माणसात दिवाळी साजरी करायची सवय असणाऱ्या मला इथे लंडन मधे माणसं जमा केल्याशिवाय कसं करमेल...पण विकांत नसेल तर कुठून येणार माणसं? .इथले सगळे सण शनिवार रविवारी साजरे होतात. इथेही जीवाभावाची मित्र मंडळी आहेत,  जमतो एकत्र खातो पितो. मजा असते...
.पण या मनातल्या दिवाळीचं काय?  प्रत्यक्षात नाही होत आता तशी साजरी  अशी तडजोड तर केलीय मनाशी... पण ही आठवणीतील दिवाळी कायम असते माझ्यासोबत,  तशीच्या तशी.

 आणि तुम्ही, सर्व सोडून गेलेली मंडळी...आता वर जोरात दिवाळी करत असाल ना... तिथेच उपस्थिती जास्त आहे आता या कंपुतली...
तुमच्या शिवाय जगताना होणारी आमची तारांबळ पाहून छान करमणूक होत असेल नाही? आम्हाला पडलाय तसा तुम्हालाही पडतोय का हा प्रश्न ? जिएं तो जिएं कैसे बिन आपके?

वसुधैव कुटुंबकम्

ही अवघी वसुधा हा परिवार असं मानणारी आपली संस्कृती. मग दिवाळी साजरी करायची ती फक्त भारतीय समाजा पुरती मर्यादित न ठेवता इथल्या स्थानिक लोकांना देखील यात सामील करायला हवं असा विचार मनात प्रबळ होत होता. आमचे भारतीय मित्र आणि त्यांच्या परिवारासोबत दिवाळी आणि इथल्या इंग्लिश लोकांबरोबर त्यांचे सण असं विभाजन न करता तन्मय ला  सर्वांना सामील करून घेणाऱ्या भारतीय संस्कृतीची ओळख आपल्या घरातूनच व्हावी हा उद्देश.

विचार पक्का झाला आणि  तन्मय च्या वर्गातल्या मुलांच्या आई मंडळींच्या WhatsApp group  var तारीख , वेळ कळवली आणि सर्व मुलांना व त्यांच्या भावंडांना घेऊन यायचे आमंत्रण दिले. प्रचंड उत्साहाने सगळ्या आया येतो असं कळवू लागल्या. त्यांनी ही कल्पना फारच अगत्याने स्वीकारली आणि काही मदत लागली तर सांग अशी प्रेमळ विनंतीही केली.
तन्मय च उत्साह आणि उत्कंठा शिगेला पोचली होती. मी लागेल ती मदत करीन पण आपण नक्की हा कार्यक्रम करूया असं सारखं सांगत होता मला. माझ्यासारखं त्यालाही सर्वांना घरी बोलवायला आवडतय हे पाहून मीही मनोमन सुखावले.

भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम करायचा ठरला. यावर्षी शाळेला हाफ टर्म ची सुट्टी दिवाळीच्या काळात  असल्याने हे जमून आलं. Preeti Rajesh , सुतेजा या सजावटीमध्ये आणि कार्यक्रम आखणी मधे तरबेज असलेल्या मैत्रीणीना फोन केले आणि प्लॅन सांगितला. त्यांनी दोघींनी खूप छान कल्पना सुचवल्या. सूतेजा तर त्यादिवशी येऊन मदत करेन म्हणाली. याने माझा उत्साह आणि आत्मविश्वास दोन्ही द्विगुणित झाले. सुतेजा आणि प्रणती यांनी खरंच वेळेआधी येऊन लागेल ती मदत केली.
श्रेया ने पेपर कापून दिले.
25 मुलं आणि 15 मोठी माणसं अशी आम्ही सगळी आमच्या घरी जमलो. मुलांना एकत्र बसवून थोडक्यात दिवाळीची माहिती, किल्ला केला होता त्याची माहिती दिली. टॉयलेट रोल पासून आकाशकंदील आणि प्ले दोव्ह च्या पणत्या बनवणे अशा दोन  activities ठेवल्या होत्या.  मुलांनी खूपच उत्साहाने आणि मन लावून  या दोन्ही activities केल्या.
बटाटेवडा, शंकरपाळी, बिन तिखटाचा चुरमुर्याचा चिवडा, शेवपुरी आणि त्या वर घरी बनवलेले आंबा आईसक्रीम असा बेत होता.
जमलेली सर्व मुलं खूप गुणी होती खरंच, खूप जास्त आवाज  यापलिकडे जाऊन कोणत्याही आक्षेपार्ह गोष्टी त्यांनी केल्या नाहीत त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय निर्विघ्नपणे पार पडला. स्वतः केलेले आकाशकंदील आणि पणत्या घेऊन मुलं खूप आनंदात घरी परतली.
सगळे गेल्यावर तन्मय ने गळ्यात पडून  मम्मा, thank you for inviting everyone,  I enjoyed every bit of it asa  sangat  सुरेख दाद दिली.  बस् अजुन काय पाहिजे? माझी दिवाळी साजरी व्हायला!

Celebrated Diwali with Tanmays friends. It was great fun to have everyone at home. Thank you so much guys for the enthusiasm. Kids and mums were simply amazing.

या चिमण्यांनो परत फिरा रे

लता ताईंनी गायलेलं खळे काकांचं हे अजरामर गीत. स्वर आणि चाल तर हेलावून टाकणारी आहेच पण त्याही पेक्षा माडगूळकरांचे शब्द कातर करणारे आहेत.  घरातून बाहेर पडून , आपली आपली आव्हाने झेलणाऱ्या, नवीन क्षितिजे पादाक्रांत करणाऱ्या लेकरांना घरी परतण्यासाठी घातलेली आईची प्रेमळ आर्त हाक. त्या हाकेला प्रतिसाद न देता राहणारा एखादाच.
पण अशी हाक मारणारी आईच उरली नाही तर लेकराने काय करायचं...घराची ओढ तरीही लागतेच... आठवणी तरीही साद घालतात...घरी जायची तयारी पण जोरात सुरू असते. तिकीट बुक केलं जातं, मन मात्र विषण्ण. ती वाट बघणारी माऊली कुठेय आता, उत्साहाने भरभरून, चारी ठाव स्वयंपाक तयार ठेवून वाटेकडे डोळे लावून बसणारी...
तिला कुठे फोन करता येतोय, झालं बुकिंग , आलेच, असं म्हणायला...नुसतच कासावीस होणं. उगाच जाऊन सगळ्या WhatsApp group येण्याची वर्दी द्यायची, खरतर तिला सांगायचंय की मी येतेय पण कुठे सांगता येतंय...तरी व्यर्थ धडपड करायची. तळमळ कशाची आणि काउंटर active बुद्धिवादी तडजोडी कसल्या. सगळच केविलवाणं.

जिवाभावाची , माझी असलेली  माणसं आहेत इथे समवेत आणि भारतातही.  खरं सांगायचं तर उन्हीसे तो दुनिया कायम है मेरे लिये... पण जे हातातून निसटून गेलं, अनंतात विलीन झालं ते अमूल्य  होतं... अपूरणीय आहे.

 मनाला कितीही माहीत असलं की असं होणारच तरी प्रत्यक्ष त्या परिस्थितीतून जाताना घालमेल ही होतेच. We can't  precisely anticipate the sinking feeling of loosing our loved one in life . In anticipation we always under or over estimate the gravity of feelings. What you actually go though after is incomparable to what you had anticipated.

Guys enjoy the privilege of having family and loved ones  before it's too late.🙏

अदिती/ मोनाली